हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सवर पराभवाची नामुष्की, रोहित-बुमराह लढले तरीही हरले...​

अहमदाबाद : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सवर आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली. जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा या दोघांनी दमदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले होते. पण अन्य खेळाडूंना त्यांना चांगली साथ देता आली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. पण मुंबई इंडियन्सला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही आणि त्यांचा सहा धावांनी पराभव झाला.

गुजरात टायटन्सच्या १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात ईशान किशनच्या रुपात धक्का बसला. ईशानला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर काही वेळ नमन धीरने १० चेंडूंत २० धावांची खेळी साकारली. पण तिसऱ्याच षटकात तो बाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. मुंबई इंडियन्सची तिसऱ्याच षटकात २ बाद ३० अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सला विजयाचा पाया रचून दिला होता तो रोहित शर्माने. पण मुंबईच्या संघाला त्यावर कळस रचता आला नाही.

रोहित शर्माने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी केली आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला शतकाची वेस ओलांडता आली. रोहितने यावेळी डेवाल्ड ब्रेव्हिसबरोबर ७७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. पण रोहित शर्माला यावेळी अर्धशतक मात्र झळकावता आले नाही, पण तो त्याची जबाबादारी पार पाडून गेला. रोहितने यावेळी २९ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची दमदार खेळी साकारली. रोहितच्या या खेळीने मुबईला विजयाचा पाया रचून दिला. रोहितने फक्त हार्दिकला फलंदाजीत मदत केली असे नाही, तर रोहितने मुंबईची गोलंदाजी सुरु असताना हार्दिकला मार्गदर्शनही केले. या गोष्टीचा हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला चांगलाच फायदा झाला. रोहित बाद झाल्यावर ब्रेव्हिस आणि तिलक वर्मा यांनी जोडी चांगलीच जमली. पण ब्रव्हिस त्यानंतर ४६ धावांवर बाद झाला आणि मुंबईला अजून एक धक्का बसला. हार्दिक पंड्या मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि तिथेच हा सामना मुंबईच्या हातून निसटला.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात टॉस जिंकला आणि हार्दिकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण जसप्रीत बुमराहने यावेळी आपल्या पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला यश मिळवून दिले. बुमराहने वृद्धिमान साहाला १९ धावांवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्याने बुमराहला थेट १७ व्या षटकात मुंबईच्या संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये अचूक आणि भेदक मारा केला.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना चांगलाच रंगतदार झाला. गुजरातच्या घरच्या मैदानात हा सामना असल्यामुळे हार्दिक पंड्यावर सर्वांचेच लक्ष होते.

2024-03-24T18:10:33Z dg43tfdfdgfd