हार्दिकने मुंबईच्या कॅप्टन्सीपेक्षा या एकाच गोष्टीचा विचार करावा, रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला

मुंबई : हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्विकारले आणि त्यानंतर त्याच्याबाबात बऱ्याच गोष्टी बिघडल्या. त्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी आता हार्दिकला एक मोलाचा सल्ला दिला आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा विचार न करता या एका गोष्टीचा सर्वात जास्त विचार करावा, असे आता शास्त्री यांनी सांगितले आहे.

हार्दिकने सध्या आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. पण मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेण्याचे ठरवले आणि हार्दिकने कर्णधारपदाची मागणी केली. मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकची मागणी मान्य केली आणि त्याला कर्णधार बनवले. पण कर्णधार झाल्यापासून हार्दिकला चाहते जोरदार ट्रोल करत असल्याचे समोर आले आहे. जिथे जिथे हार्दिक जातो तिथे तिथे त्याला चिडवले जात आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या या गोष्टींना वैतागला असावा. त्यामुळे हार्दिक आता काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण त्याचवेळी आता हार्दिकला रवी शास्त्री यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, " हार्दिक पंड्याने २०२१ साली मुंबई इंडियन्सला सोडचिठ्ठी दिली ती कर्णधारपदासाठी. त्यानंतर हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सच्या संघात गेला. गुजरात टायटन्सच्या संघाने हार्दिकला कर्णधारपद दिले. हार्दिक प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार झाला होता. पण त्यानंतर हार्दिक पंड्या हा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात परतला तो कर्णधारपदासाठी. मला एकच गोष्ट कळत नाही की, हार्दिक पंड्या या एका गोष्टीसाठी एवढा भुकेला का आहे. कर्णधारपद भूषवण्यापेक्षा हार्दिकने प्रथम आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे." रवी शास्त्री यांनी यावेळी हार्दिकच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

फक्त कर्णधारपदाची लालसा असल्यामुळे हार्दिक पंड्या हा गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. पण दुसरीकडे त्याला स्वत: ची कामगिरी मात्र सुधारता आलेली नाही. आतापर्यंतच्या मुंबईच्या दोन्ही सामन्यांत तो एक खेळाडू म्हणून अपयशी ठरला आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो सर्वात महत्वाचा आहे.

हार्दिक पंड्याला सध्याच्या घडीला जोरदार ट्रोल केले जात आहे. पण हार्दिकने स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर जर मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला तर चाहते त्याला ट्रोल करणं बंद करू शकतात. पण हार्दिकचे स्वत:च्या कामगिरीवर जास्त लक्ष नसल्याचेच आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे हार्दिक आता तिसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-01T08:43:07Z dg43tfdfdgfd