हार्दिकने मॅचविनर खेळाडूला केले संघाबाहेर, मुंबई इंडियन्सच्या संघात तीन मोठे बदल

जयपूर : मुंबई इंडियन्सच्या संघाने टॉस जिंकला आणि कर्णधार हार्दिक पंड्याने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिकने मुंबईचा या सामन्यासाठी संघ जाहीर केला. यावेळी हार्दिकने संघ निवडताना सर्वांनाच धक्का दिला. कारण मॅचविनर खेळाडूलाच हार्दिकने यावेळी संघाबाहेर काढले. त्याचबरोबर संघात तीन बदल केले.

हार्दिकने यावेळी मुंबई इंडियन्सला ददार विजय मिळवून देणाऱ्या रोमारिओ शफर्डला संघाबाहेर केले. हार्दिकने शेफर्डबरोबरच आकाश मढवाल आणि श्रेयस गोपाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावेळी हार्दिक पंड्याने राजस्थानच्या सामन्यासाठी पीयुष चावला, नेहाल वधेरा आणि नुवान तुषारा यांची संघात निवड केली.

मुंबई इंडियन्सचा आयपीएल टी-२० स्पर्धेच्या लढतीत आज, सोमवारी सामना होईल तो सध्या गुणतक्त्यात अव्वल असणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध. गोलंदाजांची कामगिरी उंचावण्याचे ध्येय मुंबईपुढे आहेच; पण आपल्या घरच्या मैदानावरील दारूण पराभवाची सव्याज परतफेड करण्याचा निर्धारही मुंबईने केला आहे.

गेल्या चार सामन्यांत तीन विजय मिळवत मुंबईने कामगिरी उंचावली आहे. गेल्या लढतीत आशुतोष शर्माच्या अर्धशतकी खेळीला निष्प्रभ ठरवत मुंबईची पंजाबवर मात केली होती. फॉर्मात असणाऱ्या बुमराहने पंजाबविरुद्ध टिपले तीन मोहरे टिपले होते. नव्या चेंडूनिशी मारा करताना बुमराह प्रभावी, धावा रोखण्यातही यश मिळाले होते. यंदाच्या स्पर्धेत आत्तापर्यंत १३ विकेट टिपणारा बुमराह गोलंदाजांमध्ये सध्या अव्वल स्थानी आहे. माजी कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीत सातत्य, तिलक वर्माकडूनही छान साथ मिळत आहे. सूर्यकुमार यादवला गवसलेला सूर ही सकारात्मक बाब, समजली जात आहे. पंजाबविरुद्ध सूर्याची ५३ चेंडूंत महत्त्वपूर्ण ७८ धावांची खेळी लक्षणीय ठरली होती.

बुमराह वगळता मुंबईच्या इतर गोलंदाजांचा मात्र संघर्ष पाहायला मिळत आहे. कोएत्झीच्या नावावर १२ विकेट; पण धावा रोखण्यात त्याला अपयश येत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आकाश मढवाल, कर्णधार हार्दिक पंड्याही निष्प्रभ ठरत आहेत. गोपाळने तीन सामन्यांत प्रत्येकी तीन विकेट टिपल्या असून ही दिलासादायक गोष्ट आहे. मुंबईकडून अष्टपैलू मोहम्मद नबीच्या गोलंदाजीचा पुरेपूर वापर होणे अपेक्षित आहे, पण तसे अजून घडलेले नाही. ईशान किशनच्या कामगिरी सातत्याचा अभाव, हार्दिक पंड्यादेखील धावांच्या प्रतीक्षेत आहे.

यंदा वानखेडेवरील लढतीत राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने मुंबईच्या फलंदाजांना नाचविले होते. त्यावेळी त्याने आघाडीच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडू दिला नव्हता, आताही बोल्टच्या कामगिरीकडे लक्ष लागलेले असेल. गोलंदाज आवेश खान डावाच्या अखेरच्या षटकाची जबाबदारी नेटाने पार पाडतो आहे. गोलंदाज कुलदीप सेनने धावा रोखणेही आवश्यक आहे. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने १२ मोहरे टिपून उपयुक्तता सिद्ध केली, अश्विनला अपेक्षित यश मात्र मिळालेले नाही. फलंदाज रियान परागने आत्तापर्यंत ३१८ धावा फटकावत राजस्थानच्या विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कर्णधार संजू सॅमसनने काही महत्त्वाच्या खेळी साकारत २७६ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा जोस बटलरने कोलकात्याविरुद्धच्या गेल्या लढतीत राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला. सलामीवीर जयस्वालचा हरपलेला सूर राजस्थानसाठी चिंतेची बाब; शिमरॉन हेटमायर मात्र आवश्यक तेव्हा योगदान देतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T14:03:12Z dg43tfdfdgfd