हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं

मुंबई : विराट कोहली दुसऱ्यांच्या मदतीला कसा धावून जातो, हे वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवर चाहते चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एकच गोष्ट करत सर्वांची मनं जिंकून घेतली. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

वानखेडे स्टेडियमवर आरसीबीला गुरवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागला. मुंबईने कर्णधारपद बदलण्याच्या निर्णयाला अद्याप सहमत नसलेल्या चाहत्यांकडून हार्दिकला जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच चाहते ही त्याला सामन्यादरम्यान डिवचताना दिसतात. गुरुवारी झालेल्या सामन्यात असेच काही झाले तेव्हा किंग कोहलीने चाहत्यांना आवाहन केले.

वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी क्रीजवर फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला डिवचायला सुरुवात केली, तेव्हा विराट कोहली नाराज झाला होता. मुंबईच्या नवनियुक्त कर्णधाराबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे थांबवावे, असे आवाहन कोहलीने चाहत्यांना केले. त्याचबरोबर त्याने चाहत्यांना हार्दिक पांड्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले. हार्दिक हा भारताकडूनच खेळतो, तो भारताचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला ट्रोल करणे थांबवा, असे त्याने चाहत्यांना यावेळी सांगितले. चाहत्यांनी ही गोष्ट सांगितल्यावर चाहत्यांनी हार्दिकला चिडवणे बंद केले.

विराट कोहलीच्या आवाहनाचा पाठलाग करताना मुंबईला १२ व्या षटकात रोहित शर्माच्या रूपात दुसरा धक्का बसला. यानंतर हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादवला साथ देण्यासाठी क्रीजवर आला. हार्दिक पांड्या येताच संपूर्ण स्टेडियमहूटिंग करू लागले, जे ऐकून विराट कोहली निराश झालेला दिसला. हार्दिक देशासाठी खेळतो आणि वानखेडेवरील प्रेक्षकांच्या अशा वागण्याला तो पात्र नाही, असे कोहली सांगत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले होते.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक दरम्यानही चाहत्यानी हार्दिक बरेच चिडवले होते. त्यानंतर प्रसारक संजय मांजरेकर यांनी मध्यस्थी करत उपस्थितांना संयमाने वागण्याचे आवाहन केले. आरबीसीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या जेव्हा गोलंदाजी करायला आला तेव्हा त्याला चिडवण्यात आलं होतं.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम पाच विकेट्सनंतर मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर बेंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला. ईशानने अवघ्या ३४ चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. तर सूर्यकुमारने १९ चेंडूत ५२ धावा करून प्रेकक्षकांचे मन जिंकले, ज्यात ४ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. मुंबई इंडियन्सने आरसीबीला दिलेले १९७ धावांचे लक्ष्य १५.३ षटकांतच पूर्ण केले. आरसीबीचा आयपीएल २०२४ मधील सहा सामन्यांतील हा पाचवा पराभव आहे, तर मुंबईचा पाच सामन्यांतील दुसरा विजय आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-12T08:42:49Z dg43tfdfdgfd