टी-२० वर्ल्डकपच्या आधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; IPLमध्ये फ्लॉप ठरत आहेत भारताचे स्टार

नवी दिल्ली: आयपीएल २०२४नंतर लगेच आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. या वर्षी ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असून त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ चे आयोजन जून महिन्यात होणार आहे. या स्पर्धेच्या आधी आयपीएलचा १७वा हंगाम सुरू आहे. २२ मार्च रोजी आयपीएलला सुरूवात झाली. या महिन्याच्या अखेरपर्यंत टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूंचा फॉर्म खराब असल्याचे दिसत आहे. २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे भारताने विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. अशात या वर्षी भारतीय संघात असणारे पाच खेळाडू ज्यांचा फॉर्म आयपीएलमध्ये खराब आहे.

१) जितेश शर्मा-

पंजाब किंग्जचा विकेटकीपर आणि फलंदाज जितेश शर्मा ही टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील दावेदार आहे. पण ४ लढतीत जितेशला १५च्या सरासरीने आणि १२६च्या स्ट्राइक रेटने ५८ धावा करता आल्या.सध्या ऋषभ पंत देखील फिट झाला असून मैदानावर परतला आहे. तो धावा देखील करतोय. जर जितेशची कामगिरी चांगली झाली नाही तर पंतला वर्ल्डकपचे तिकीट मिळू शकते.

२)रविंद्र जडेजा- चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा धावा करतोय पण त्याला विकेट मिळत नाहीय. ४ मॅचमध्ये जडेजाला फक्त १ विकेट मिळवता आली. फलंदाजी देखील तो फिनिशरची भूमिका पार पाडताना दिसत नाहीय. आयपीएल २०२४ मध्ये जडेजाने ६० चेंडूत फक्त १ षटकार मारला आहे.

३)हार्दिक पंड्या-वनडे वर्ल्डकप दरम्यान दुखापत झाल्याने हार्दिक अनेक महिने मैदानाबाहेर होता. त्यानंतर डीवाय पाटील टी-२० स्पर्धेत खेळला. आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. ३ सामन्यात त्याने फक्त ६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ११च्या इकोनॉमीने धावा देत फक्त १ विकेट घेतली आहे.

४) यशस्वी जयस्वाल-इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वीला आयपीएल २०२४ मध्ये धावा करता आल्या नाहीत. त्याने ३ लढतीत १३च्या सरासरीने ३९ धावा केल्या आहेत. यातील २४ धावा एका लढतीत केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये यशस्वी रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. अशात त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

५) मोहम्मद सिराज-टी-२० वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराजच्या हाती नवा चेंडू असेल. मात्र सध्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खराब दिसत आहे. ४ मॅचमध्ये त्याला फक्त ३ विकेट मिळाल्या आहेत. तर त्याने १० पेक्षा अधिक इकोनॉमीने धावा दिल्या आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-06T10:45:11Z dg43tfdfdgfd