भारताने उघडले विजयाचे दार, रोहित आणि यशस्वीने इंग्लंडची धुलाई करत केली दमदार सुरुवात

धरमशाला : भारताने पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच विजयाचे दार उघडल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने इंग्लंडला पहिल्याच दिवशी २१८ धावांवर ऑल आऊट केले. त्यानंतर भारताने दमदार फटकेबाजी करत मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताचेच वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसअखेर भारताची १ बाद १३५ अशी धावसंख्या असून ते अजूनही ८३ धावांनी पिछाडीवर आहेत. यावेळी रोहित शर्मा ५२ आणि शुभमन गिल २६ धावांवर खेळत आहेत.

इंग्लंडच्या २१८ धावांचा पाठलाग करताना भारताने झंझावाती सुरुवात केली. रोहित शर्माने चौकारासह आपल्या खेळीची सुरुवात केली. यशस्वीही यावेळी मागे राहीला नाही. यशस्वीने रोहितच्या खांद्याला खांदा लढवला आणि या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहित आणि यशस्वी यांच्यापुढे इंग्लंडचा हा मारा बोथट वाटत होता. इंग्लंडने थोड्या वेळाने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सुपूर्द केला. पण यशस्वीने यावेळी एकाच षटकात शोएब बशिरच्या गोलंदाजीवर तीन षटकार वसूल केले. त्यामुळे आता ही जोडी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. यशस्वीने यावेळी अर्धशतक झळकावले, पण त्यानंतर मात्र यशस्वीला जास्त धावा करता आल्या नाहीत.

यशस्वीला यावेळी बशिरने बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. यशस्वीने यावेळी ५ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली. यशस्वी बाद झाल्यावर रोहित शर्माने गिलच्या साथीने धावांची गती वाढवायला सुरुवात केली. रोहितने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

तत्पूर्वी, कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी पहिला दिवस चांगलाच गाजवला. सुरुवातीला कुलदीप यादवने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आणि पाच बळींचा टप्पा गाठला. त्यानंतर अश्विन भारताच्या मदतीसाठी धावून आला. कारण अश्विनने अखेरचे चा विकेट्स लवकर मिळवले आणि त्यामुळे भारताला इंग्लंडचा पहिला डाव हा २१८ धावांत आटोपता आला. त्यानंतर रोहित आणि यशस्वी यांनी भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली. त्यामुळे आता पहिल्याच दिवशी भारतीय संघाने आपले वर्चस्व ठेवले आहे.

2024-03-07T11:41:23Z dg43tfdfdgfd