भारतासाठी फायनलमध्ये कर्दनकाळ ठरलेला हरजस सिंग आहे तरी कोण, चंदीगढपासून सुरु झाला प्रवास...

नवी दिल्ली : भारताचा U 19 World Cup 2024 मध्ये पराभव झाला. पण भारताच्या या पराभवाला सर्वात जास्त जबाबदार होता तो हरजस सिंग. चंदीगढपासून ते आतापर्यंतचा या ऑस्ट्रेलियाच्या संघापर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता, हे आता समोर आले आहे.

चंदीगढमध्ये हरजसचे वडील हे प्रसिद्ध होते एक बॉक्सर म्हणून. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. हरजसची आई अरविंदर कौर या देखील एक खेळाडू होत्या. राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेत त्या खेळल्या आहेत. हरजसच्या आई-वडिलांची ओळख भारतातच झाली. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. हरजसचे कुटुंब चंदीगढहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आणि पाच वर्षांनी हरजसचा जन्म झाला. हरजसचा जन्म २००५ साली सिडनी येथे झाला. हरजस भारताबाबत म्हणाला की, " माझे कुटुंबिय अजूनही चंदीगढमध्ये आहेत. सेक्टर-डीमध्ये आमचे घर आहे. माझे काका अजूनही तिथेच राहतात. मी त्यांना २०१५ साली भेटायला गेलो होतो. पण त्यानंतर क्रिकेट खेळण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे मला भारतामध्ये जाता आले नाही. पण भारताशी माझी नाळ अजूनही जोडली गेलेली आहे."

वयाच्या आठव्या वर्षापासून हरजस हा क्रिकेट खेळायला लागला. सुरुवातीपासून हरजस हा चांगली फलंदाजी करायचा. त्यामुळे तो स्थानिक क्रिकेटमधून राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये आला. सातत्याने तो धावा करत राहीला आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. या स्पर्धेत त्याला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. पण तरीही त्याच्यावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वास ठेवला. आपल्यावर ठेवलेला विश्वास हा हरजसने अंतिम फेरीत सार्थ ठरवला. कारण अंतिम फेरीत खेळपट्टीवरून चेंडू सहजपणे बॅटवर येत नव्हता. पण या कठीण काळात तो संघासाठी धावून आला. यावेळी हरजसने तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची महत्तपूर्ण खेळी साकारली आणि भारतासाठी तो कर्दनकाळ ठरला.

हरजस सिंगने यावेळी फक्त अर्धशतक झळकावले नाही, तर त्याने भारताच्या गोलंदाजीवर प्रहार करत त्यांच्यावर दबाव कायम ठेवला.

2024-02-11T16:01:54Z dg43tfdfdgfd