विराट कोहलीमुळे घरच्या मैदानावर RCBची लाज गेली; काय उपयोग अशा ऑरेंज कॅपचा ज्यामुळे संघाचा पराभव होतो

बेंगळुरू: आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत आरसीबीचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने नाबाद ८३ धावांची खेळी केली. विराटच्या फलंदाजीमुळे आरसीबीने १८२ धावांची धावसंख्या उभी केली. पण विराटची ही खेळीच संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

विराटचे आयपीएलमधील हे सलग दुसरे तर टी-२० करिअरमधील १०१वे अर्धशतक ठरले. त्याने ५९ चेंडूत ८३ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस सोबत सलामीला आलेल्या विराटने जवळजवळ १० षटके फलंदाजी केली. पण ज्यात त्याने फक्त ४ चौकार आणि ४ षटकार मारले. टी-२० क्रिकेटचा विचार करता जर एखादा फलंदाज ५० चेंडू फलंदाजी करतो तर त्याच्याकडून १०० धावांची अपेक्षा केली जाते. केकेआरविरुद्ध विराटची ही धीमी फलंदाजी संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरली.

केकेआरविरुद्धच्या या खेळीमुळे विराटला ऑरेंज कॅप मिळाली. विराट सध्या या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे. पण अशा ऑरेंज कॅपचा काय फायदा ज्यामुळे संघाचा पराभव झाला असेल. विराटने ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत.

विराटने केकेआरविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली होती. त्याने २० चेंडूत ४० धावा केल्या होत्या. तेव्हा त्याचा स्ट्राइक रेट २०० इतका होता. पण त्यानंतर विराट वनडे क्रिकेट खेळू लागला. त्याने पुढील ४३ धावांसाठी ३९ चेंडू घेतले. याचा परिणाम संघाच्या धावसंख्येवर झाला आणि त्यांना २० षटकात फक्त १८३ धावा करता आल्या. केकेआरने ही लढत ७ विकेट आणि तब्बल १९ चेंडू राखून जिंकली.

बेंगळुरूचा केकेआरने घरच्या मैदानावर पराभव केला. आयपीएल २०२४ मध्ये बेंगळुरू हा असा पहिला संघ ठरला आहे ज्यांचा घरच्या मैदानावर पराभव स्विकारावा लागला. याआधी स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्व लढतीत घरच्या मैदानावर कोणत्याही संघाचा पराभव झाला नव्हता. या लढतीनंतर केकेआरचा संघ गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-30T10:08:34Z dg43tfdfdgfd